पुणे : गाव आणि तालुका पातळीवर नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याने, त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. हे हेलपाटे आता थांबणार आहेत, कारण तालुका पातळीवर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार आहे.
उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह इतर अधिकारी उपस्थित राहून समस्या सोडवणार आहेत. तसेच, नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांचे प्रश्न एका महिन्याच्या आत निकाली काढण्यात येणार आहेत. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार
राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी हा लोकशाही दिन आयोजित केला जातो. मात्र, तक्रारी वेळेत न सुटल्याने जिल्ह्यातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात,
तसेच इतर संबंधित जिल्ह्याच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारत असतात. तक्रार न सुटण्याचे प्रमाण वाढल्याने, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चकरा वाढल्या आहेत. त्यामुळेच, तालुका पातळीवरच नागरिकांचे प्रश्न सुटले, तर त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्ह्याच्या इतर कार्यालयांमध्ये येण्याची गरज पडणार नाही.
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष असतील, तर तहसीलदार हे सचिव असणार आहेत. तसेच, गटविकास अधिकारी (बीडीओ) हे सहसचिव असणार आहेत. त्यामुळे हे तीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहून तक्रारींची दखल घेतील.






.png)

No comments:
Post a Comment