शिरूर : शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांची उपस्थिती अधिक मजबूत करण्यात येणार असून, शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन स्थापन करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
पोलीस अधीक्षक देशमुख यांनी शिरूर पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिक, महिला, पोलीस पाटील आणि पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "शिरूर परिसरात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही. समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."
शहरातील बसस्थानक आणि पाटबंधारे कॉलनी परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, रात्रीच्या वेळी या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे निर्देश दिले आहेत.
शहर आणि ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालय परिसरात विनयभंगाच्या घटनांना आळा घालण्यासाठी, संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. यासोबतच, 'दामिनी पथक' अधिक सक्रिय करण्यात येणार असून, विद्यार्थिनींना कोणत्याही त्रासास सामोरे जावे लागणार नाही, याची खात्री केली जाईल.
पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना 112 या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींनी कोणतीही शंका वाटल्यास या क्रमांकावर त्वरित कळवावे, जेणेकरून पोलिसांकडून त्वरित मदत मिळेल.
शिरूर पोलीस स्टेशनला अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एस.टी. बसस्थानकाजवळ नवीन जागेत स्थलांतर करण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे नागरिकांना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि पोलिसांचे कार्यही अधिक परिणामकारक होईल.
यावेळी, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, तसेच सामाजिक कार्यकर्ते बापू सानप, शशिकला काळे, सविता बोरुडे आणि रेश्मा शेख उपस्थित होते. पोलीस अधीक्षक देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले की, "शहरात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांविरुद्ध पोलिसांना तत्काळ माहिती द्या. कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. गरज पडल्यास माझ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरही नागरिक संपर्क साधू शकतात." शिरूर तालुका सुरक्षित आणि गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांचा हा पुढाकार लवकरच प्रभावी ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.










No comments:
Post a Comment