दाभाडी (ता. मालेगाव) : आंब्याची फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीच्या २-३ आठवड्यांमध्ये ऑक्सिनवर्गीय संजिवकांच्या कमतरतेमुळे फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. ही गळ रोखण्यासाठी एनएनए संजिवकांची फवारणी करणे फायदेशीर ठरते, असे मत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलातील उद्यानविद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल विरकर यांनी व्यक्त केले.
दाभाडी (ता. मालेगाव) येथे शेतकऱ्यांच्या फळबागांना भेट देताना डॉ. अमोल विरकर यांनी आंबा उत्पादनातील समस्या आणि उपाय यावर मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. प्रशांत सोनवणे (प्रमुख, डाळिंब संशोधन केंद्र लखमापूर), डॉ. सुनीता पोपळे (अन्नतंत्रज्ञान विभाग), प्रा. चेतन सोनवणे, डॉ. उदय पवार (कीटकशास्त्र विभाग), डॉ. प्रकाश तापकीर (मातीविज्ञान विभाग) आणि डॉ. हर्षवर्धन मारकड (रोगशास्त्र विभाग) यांची उपस्थिती होती.आंबा पिकासाठी अनुकूल हवामानसध्याचे तापमान वाढले असले, तरी हवामान कोरडे आणि निरोगी आहे, त्यामुळे आंबा पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होईल, असे डॉ. विरकर यांनी सांगितले. प्रकाशसंयोग क्रियेसाठी आवश्यक असलेल्या सूर्यप्रकाशाचा पुरेसा लाभ सध्या झाडांना मिळत आहे, त्यामुळे उत्पादनात वाढ होईल.
केशर आंबा वाणात संयुक्त फुलांचे प्रमाण जास्त असल्याने उत्पादनही तुलनेने जास्त मिळते. मात्र, फळे लहान असताना वाढविरोधक संजिवकांचे प्रमाण अधिक असल्याने फळगळ मोठ्या प्रमाणात होते. ही गळ थांबवण्यासाठी ऑक्सिनवर्गीय संजिवकांची फवारणी गरजेची असल्याचे डॉ. विरकर यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांनी फळगळ थांबवण्यासाठी योग्य संजिवकांची निवड, फवारणीचे प्रमाण आणि वेळ यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी शेतकरी नितीन निकम, दिनेश हिरे, सतेज पवार, बाबा पवार, अजय काळकुटे, नामदेव पाटील, संतोष हिरे, अजय हिरे, लखन पवार आदींची उपस्थिती होती.









No comments:
Post a Comment