
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा करत "बळीराजा मोफत वीज योजना" सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. या योजनेंतर्गत 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. तसेच, 1 कोटी 34 लाख घरगुती ग्राहकांना देखील मोफत वीज मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील शेतकऱ्यांना आता 365 दिवस दिवसा वीज उपलब्ध होणार आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे संकट दूर होणार असून, महाराष्ट्र 16,000 मेगावॅट कृषी वीज पुरवठा करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज सोलर पॅनेलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणपूरक उपाययोजना शक्य होतील.
मुख्यमंत्र्यांनी घरगुती ग्राहकांसाठीही मोठी घोषणा केली. 1 कोटी 34 लाख घरगुती ग्राहकांना मोफत वीज दिली जाणार आहे. तसेच, विजेच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे.
राज्यातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्रातील 52% वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून तयार होणार आहे. यामध्ये सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि अन्य नवीकरणीय स्रोतांचा समावेश असेल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, भविष्यात डेटा सेंटर ही सर्वाधिक महत्त्वाची गुंतवणूक असेल, आणि त्यासाठी आवश्यक वीज पुरवण्यासाठी राज्य सरकार विशेष नियोजन करणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.







No comments:
Post a Comment