पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी परिवहन विभागाने कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (दि. १) परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.राज्यमंत्री मिसाळ यांनी एसटी महामंडळात स्वतंत्र सुरक्षा समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या समितीचे नेतृत्व IPS दर्जाचा सुरक्षा अधिकारी करणार असून, तो संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेवर देखरेख ठेवणार आहे. याशिवाय स्थानकांमध्ये सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
- पोलिसांची गस्त वाढवणार, विशेषतः रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त गस्त घालणार.
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली जाणार, यामुळे बसस्थानकांमधील हालचालींवर अधिक बारीक नजर ठेवता येणार.
- तक्रार निवारण कक्ष स्थापन होणार, प्रवाशांना तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
- राज्यभर एक टोल-फ्री क्रमांक सुरू करणार, त्यामुळे कुठल्याही स्थानकावरील समस्या त्वरित नोंदवता येणार.
- खासगी बस चालकांची अनधिकृत घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना, एसटी स्थानकांमध्ये शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न.
- महिला सुरक्षारक्षकांची संख्या वाढणार, महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत होणार.
केंद्र सरकारच्या स्क्रॅप धोरणानुसार, मोडकळीस आलेल्या व जुन्या बसेस १५ एप्रिलपर्यंत स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नव्या आणि अधिक सुरक्षित बसेस प्रवासासाठी उपलब्ध होतील.
राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले की, महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा ठेकेदारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. प्रवाशांनी निर्भयपणे आणि सुरक्षिततेच्या विश्वासाने प्रवास करावा, असेही त्यांनी सांगितले.







No comments:
Post a Comment